तक्रारीची नोंद केली मात्र अद्याप कार्यवाही नाही
गोंदिया : जिल्ह्यात धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जात असून त्यानुसार कंपन्या आपआपले धानाचे वाण निर्माण करून शेतकऱ्यांना विकतात. मात्र 120 दिवसांत पूर्ण होणारे वाण असल्याचे सांगून तब्बल 150 दिवस लोटल्यानंतर त्या वाणाचे धानाचे पीक आलेले नसल्याने शेतकऱ्याची कंपनीकडून फसवणूक झाल्याचे प्रकरण गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे उघडकीस आलेले आहे. याप्रकरणी शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले असून शेतकऱ्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याने सदर शेतकऱ्याला मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील अल्प भूधारक शेतकरी ओमेंद्र शोभेलाल रहांगडाले यांनी आपल्या कोरडवाहू शेतीकरिता आयटीआय फुलचुर येथील कृषी केंद्रातून कमी दिवसात निघणारे प्रियंका कंपनीचे धानाचे वाण विकत घेतले. शेती ही वरथेंबी पावसावर अवलंबून असल्याने व पाण्याचे साधन नसल्याने त्यांना हलका वाण (कमी दिवसांत निघणारे) हवे होते. वाण विकत घेतेवेळी सदर धान पीक 120 दिवसात निघणार असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी सदर प्रियंका कंपनीच्या 120 दिवसांत निघणारे वाण SRTSE 27/0371041 A-RI दिनांक 11 जून 2024 रोजी प्रत्येकी 10 किलोग्राम च्या 2 बॅग 1660 रुपयांना खरेदी करून 12 जून रोजी पऱ्हे टाकले व त्यानंतर लागवड केली. मात्र 120 दिवसांचा कालावधी लोटूनही धान पीक गर्भी न आल्याने शेतकऱ्याला चिंता वाटू लागली. त्यांनी याबाबत कृषी केंद्राचे संचालक रहांगडाले यांना याबाबत माहिती देवून विचारणा केली व कंपनीला माहिती दिली. याबाबत 120 दिवसात निघणारे वान 140 दिवसातही न निघाल्याने व सिंचनाची सुविधा नसल्याने या वाणाची लागवड केल्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याबाबत प्रियंका कंपनीकडून थातूरमातूर उत्तरे देऊन टोलवाटोलवी केली जात असून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे कंपनीमुळे आपले झालेले नुकसान भरून देण्याची मागणी ओमेंद्र रहांगडाले यांनी केली आहे.
‘प्रियंका’ वाणाने शेतकऱ्याला फसविले, 120 दिवसाच्या धानाचे वाण निघाले 160 दिवसांचे
RELATED ARTICLES