गोंदिया : रस्ते अपघात कमी करण्यासाठी वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेता नागरिकांमध्ये वाहतूक नियम पालनाबाबत जनजागृती करावी. विशेषतः शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलामुलींमध्ये प्रामुख्याने जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केल्या. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, कार्यकारी अभियंता नरेश लभाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट लावणे व वाहतूक नियमांचे पालन करणे हे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचे तत्व व्हायला हवे. वाहन चालक बऱ्याचवेळा अतिवेगाने वाहन चालवितात. अतिवेग हा अपघाताचे मूळ कारण आहे. त्यातच हेल्मेट किंवा सीटबेल्टचा वापर न केल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता दुचाकी स्वारांनी हेल्मेट व चारचाकी वाहन चालक व कारमध्ये बसणाऱ्यांनी सीटबेल्ट अवश्य वापरावा असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.र स्त्यावरील स्पीड ब्रेकर आयआरसीच्या मानांकनानुसार असणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, मानांकनानुसार नसलेले स्पीड ब्रेकर सुद्धा अपघाताला कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे स्पीड ब्रेकरची उभारणी करतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या बैठकीत मागील पाच वर्षातील अपघात, अपघात प्रवण स्थळ, रस्ते उपाययोजना व करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील एकूण आपघातांपैकी पन्नास टक्के अपघात हे दुचाकीचे होत असून सायंकाळी ६ ते ९ या काळात सर्वाधिक अपघात होत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात एकूण आठ ब्लॅक स्पॉट असून अन्य ३३ ठिकाण अशी आहेत की ज्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, ती ठिकाण निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक नियम पालनाबाबत नागरिकात जागृती करावी : जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे
RELATED ARTICLES






