गोंदिया : समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर असलेल्या अशिक्षितपणा, मागासलेपणा, गरिबी, लहान वयात लग्न करण्याचे रुढी परंपरा, जाती व्यवस्था यामुळे बाल विवाहाचे प्रमाण वाढत आहेत. भारतीय संस्कृतीत विवाह ही समाजातील महत्वाचे आणि सार्वत्रिक सामाजिक क्रिया आहे. सहाजिकच शुभ मुहूर्तावर सामुदायिक तसेच एकल विवाह समारंभ आयोजित केले जातात, यामध्ये बाल विवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर्षी अक्षयतृतीया हा दिवस 30 एप्रिल 2025 रोजी असून हा दिवस शुभ मानून यावेळी बाल विवाह सुध्दा मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.
दिनांक 3 जून 2013 च्या अधिसूचनेनुसार तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 (2007 च्या 6) कलम 16 ची पोटकलम (1) व (3) नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी) आणि प्रकल्पांतर्गत नेमलेल्या आंगनवाडी पर्यवेक्षिका व ग्रामपंचायत स्तरावर संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे, तसेच सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून आंगनवाडी सेविका घोषित केले आहे. दिनांक 17 एप्रिल 2025 रोजीच्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग नवी दिल्ली यांच्या ऑनलाईन बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग तसेच जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी अक्षयतृतीया या दिवशी बालविवाह होणार नाही याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे निर्देश दिले. त्यामुळे बालविवाह रोखणे आणि बाल हक्काचे संरक्षणासाठी अधिक सक्षमपणे प्रयत्न होणे आवश्यक आहे. अक्षयतृतीयाच्या शुभ मुहुर्तावर किंवा इतर वेळेस होत असलेले विवाह समारंभात बाल विवाह होणार नाही यासाठी प्रत्येक सुजान नागरिकांनी याची खबरदारी घेतली पाहिजे. 18 वर्षाच्या आत मुलीचे लग्न व 21 वर्षाच्या आत मुलाचे लग्न लावणे कायद्याने गुन्हा आहे. बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असून बालकांशी विवाह करणाऱ्याला व करुन देणाऱ्याला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व 1 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते. असे बाल विवाह आपल्या गावात होत असल्यास तसेच बाल विवाहाबाबत माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे (मो.9834878519), संरक्षण अधिकारी रविंद्र टेंभुर्णे (मो.9765266756), संरक्षण अधिकारी मुकेश पटले (मो.8007148542) यांच्या भ्रमणध्वनीवर तसेच चाईल्ड हेल्पलाईन 1098 टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर यांनी केले आहे.
बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध यंत्रणा तसेच सुजान नागरिकांनी अक्षयतृतीया या दिवशी बाल विवाह होणार नाही याची खबरदारी घ्यावी
– जिल्हाधिकारी प्रजित नायर
बाल विवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अक्षयतृतीया या दिवशी समाजात चालत असलेल्या रुढी परंपरेनुसार बाल विवाह करु नये, असे केल्यास बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अनुषंगाने कायद्याच्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील
– जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनीकर