गोंदिया : गावातील विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या अंधाराला वाचा फोडण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजकुमार प्रितीलाल गौतम यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता दि. ६ जून २०२५ पासून गोरेगाव तालुक्यातील कुऱ्हाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. गावाच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न मांडण्यासाठी, अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी, आणि भ्रष्टाचाराला थांबवण्यासाठी राजकुमार गौतम यांनी हा निर्णायक टोकाचा मार्ग निवडला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले “जोपर्यंत चौकशी होत नाही, दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे उपोषण थांबणार नाही. माझ्या जीवाला काही झाले, तर जबाबदार कोण असेल, हे गावाला ठाऊक असावे.” गौतम यांच्या म्हणण्यानुसार, गावात लावण्यात आलेल्या हायमास्ट लाईटसाठी सुमारे १,९६,००० रुपये खर्च दाखवण्यात आला, परंतु प्रत्यक्षात त्या कामात गंभीर अनियमितता आहे. १५व्या वित्त आयोग, ठक्करबाबा योजना, व इतर निधीतून झालेल्या रस्ते, नाली, गटारी आदी कामांमध्येही अपारदर्शकता असून, ग्रामविकास अधिकारी सिवानंद गौतम यांनी मनमानीने बिल, कोटेशन व इतर कागदपत्रे तयार केल्याचा गौतम यांचा आरोप आहे.
“सत्तेत बसलेले काहीजण जनतेच्या पैशांची लूट करत आहेत, आणि आवाज उठवणाऱ्यांना अरेरावीने गप्प करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असे गौतम यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी उद्दट वर्तन केल्याचा देखील त्यांनी गंभीर आरोप केला आहे. गौतम यांच्या या लढ्याला आता गावकऱ्यांचा पाठिंबा मिळतोय. हे उपोषण केवळ एका व्यक्तीचा निषेध नसून, संपूर्ण गावाच्या न्यायाची मागणी आहे. त्यांनी हे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलिस निरीक्षक व आमदार विजय रहांगडाले यांना पाठवून आपल्या मागण्यांचा ठाम पवित्रा मांडला आहे.