Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री धडाडीने काम करतात म्हणून विरोधक प्रचंड अस्वस्थ; फडणवीसांनी साधला निशाणा

मुख्यमंत्री धडाडीने काम करतात म्हणून विरोधक प्रचंड अस्वस्थ; फडणवीसांनी साधला निशाणा

 

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता. महाविकास आघाडी सरकारने गेली अडीच वर्षे शेतकरी आणि कोणत्याही घटकाला मदत केली नाही. आपले सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे. आतापर्यंत आपण शेतकऱ्यांना ७००० कोटींची मदत दिली, असे सांगतानाच अतिशय धडाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार काम करते आहे, ती स्पीड मॅच करता येत नाही म्हणून विरोधक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ‘नरेटिव्ह’ तयार करायचा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागण्यात आले, तेव्हा आज आंदोलन करणारे गप्प बसायचे आणि आता ते फक्त अस्वस्थतेतून रस्त्यावर आले आहेत, अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीकास्त्र सोडले.

उपमुख्यमंत्री फडणवीस भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत बोलत होते. महाविकास आघाडीवर आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यावर टीकास्त्र सोडताना फडणवीस म्हणाले की, ज्यांची कॅसेट ‘मुंबई तोडण्याचा डाव’ यावर अडकली आहे, त्यांना मेट्रो-३ का झाली नाही, मुंबई आणि महाराष्ट्राचे सर्व प्रकल्प का अडकवले, याचे उत्तर मागितले पाहिजे. १५ दिवसात मुंबई सुंदर होऊ शकते, तर मग २५ वर्ष सत्तेत राहणारे ती का करू शकत नाही?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विविध घटकांच्या शिष्यवृत्ती थांबल्या. आता आपले सरकार आल्यावर DBT तून १००० कोटी रुपये वितरीत केले, असे सांगतानाच सभागृहात मी सगळे आकडे देणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, ‘सीमावाद आता तयार झाला का? उलट आपले सरकार होते तेव्हा न्यायालयात खटल्यासाठी पुढाकार घेतला. ७७ गावांना आपल्या काळात पाणी दिले. मधल्या अडीच वर्षात काहीच झाले नाही. आता काल पुन्हा २००० कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी मंजूर केले. काही विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या आणि ठराव करून घेतले. सचिन कल्याणशेट्टी यांचे मी अभिनंदन करतो, त्यांनी त्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि महाराष्ट्रात राहण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला.’

वारकरी परंपरा हे महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला डिचविण्याचा नाही तर खिल्ल्ली उडविण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच सामान्य जनता मोर्चात आली नाही आणि यांचा मोर्चा हा नॅनो मोर्चा झाला. पैसे वाटतानाचे व्हिडिओ आले, कोण कशासाठी आले, हे ठावूक नसलेला व्हिडिओ पाहिला. आपली लढाई विरोधकांशी नाही, आपल्याशी लढण्याचा त्यांच्यात दमच नाही. आपली लढाई नरेटिव्हशी आहे, असेही ते पुढे म्हणाले.

आपल्या सरकारला यशस्वी करायचे आणि त्यासाठी सर्वस्व झोकून द्यायचे आहे, ही पुढच्या काळात प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लौकिक वाढतो, तेव्हा तो संपूर्ण भारताचा गौरव असतो. प्रत्येक भारतीयाचा गौरव असतो. जग अजूनही मंदीचा सामना करीत असताना भारत मात्र वाढीच्या दिशेने निघाला आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यावर आढावा घेतला, तेव्हा प्रधानमंत्री आवास योजनेत पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र त्यांनी १६ व्या क्रमांकावर नेऊन ठेवला होता. काही हप्ते मिळत नाही, तोवर सामान्य जनतेला पैसे रिलीज केले नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments