Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedलोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करणे आवश्यक : एम. मुरुगानंथम

लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करणे आवश्यक : एम. मुरुगानंथम

स्वीप सेलचा अभिनव उपक्रम
गोंदिया : येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ८५ टक्क्यांवर जावी यासाठी जिल्हा प्रशासन व स्वीप सेल यांनी विविध उपक्रम हाती घेतले असून याचाच एक भाग म्हणून शुक्रवार ५ एप्रिल रोजी जिल्हाभरात विविध स्तरावर मतदानाची शपथ घेतली जाणार आहे. या मोहिमेत अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, महिला बचत गट, अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याची शपथ घेणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळात या भव्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून यात जिल्ह्यातील आठ लाखांवर मतदार मतदान करण्याची शपथ घेणार आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्याचे मतदान प्रतिशत ६७ टक्के एवढे होते. या निवडणुकीत ही टक्केवारी ८५ टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नरेगा कामांवर, शाळा महाविद्यालय आदी ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात तर अनेक ठिकाणी वैयक्तिक पातळीवर ही शपथ घेतली जाणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मतदान करण्याची शपथ घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले.
अठराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. स्वीप सेल अंतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता अथक प्रयत्न सुरु असून लोकशाही बळकटीकरणासाठी मतदान करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मतदान करण्यासाठी शपथ घेण्याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी माहिती देतांना ते बोलत होते. उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, स्वीपचे नोडल अधिकारी शिखा पिपलेवार व डॉ. महेंद्र गजभिये यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
एम. मुरुगानंथम म्हणाले, लोकशाही प्रणालीत मतदार हा राजा असतो. लोकशाहीमध्ये निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव मानला जातो. हा उत्सव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने साजरा करण्याच्या उद्देशाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकशाही बळकटीकरणासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांसाठी 5 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मतदान करण्यासाठी शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात एकाच वेळी जिल्ह्यातील सर्व गावातील प्रत्येक नागरिकांनी, बचत गट, समाजसेवी संस्था, सर्व शिक्षक, कर्मचारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), जि.प.कर्मचारी, राज्य शासकीय कर्मचारी, सर्व महाविद्यालये, दवाखाने, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, आठवडी बाजार, नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या बाजारपेठा, बँक, पोष्ट ऑफिस अशा सर्वच कार्यालयामध्ये मतदान जागृतीकरीता मतदान करण्याची शपथ घेण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अंबेकर म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. प्रमुख राजकीय पक्षासह 18 उमेदवार या निवडणुकीत आपले भविष्य आजमावणार आहेत. गोंदिया व तिरोडा या विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असून अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. दिनांक 27 मार्च 2024 च्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील 10 लाख 92 हजार 546 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार- 5 लाख 41 हजार 272 असून स्त्री मतदार- 5 लाख 51 हजार 264 आहेत व इतर 10 मतदारांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांना त्यांच्या मतदान केंद्र, स्थळ, मतदानाची तारीख व वेळेबाबतची माहिती होण्याच्या अनुषंगाने मतदार चिठ्ठया (Voter Information Slip) छपाई करण्यात आले असून संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मार्फत वाटप करण्याची कार्यवाही सुरु आहे असे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments