Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedहिवताप नियत्रंणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा : एम.मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी

हिवताप नियत्रंणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा : एम.मुरुगानंथम, मुख्य कार्यकारी अधिकारी

गोंदिया : पावसाळ्यात हिवताप, डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ वाढण्याचा धोका असतो. वरील सर्व आजार डासांपासून होत असतात. त्यामुळे हिवताप प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी दर आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी नागरिकांना केले आहे.तसेच त्याचबरोबर हिवताप,डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ नियत्रंणासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी जून महिन्यात हिवताप प्रतिरोध महिना राबविण्यात येत असतो. संपुर्ण पावसाळ्यात किटकजन्य आजाराबाबत प्रतिबंधक अभियानाची अंमलबजावणी केली तर निश्चीतच आपण हिवताप,डेंग्यु, मेंदुज्वर सारख्या किटकजन्य आजारांची साथ रोखु शकतो असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी माहीती दिली आहे.या अभियानांतर्गत आठवड्यातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी केली जातात.ही भांडी घासून पुसून कोरडी केली जातात आणि घरातील सर्व पाणीसाठे झाकून ठेवावे.यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात मदत होते, असे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी सांगितले.
दरवर्षी जून महिन्यात पाऊस कधी कमी, तर कधी जास्त प्रमाणात पडत असतो. यामुळे डासांना पोषक वातावरण तयार होते.परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होत असते. या डासांमुळे आणि पावसाळ्यातील दूषित पाण्यामुळे कीटकजन्य व जलजन्य आजार उदभवत असतात. या जलजन्य आणि किटकजन्य आजारांना आळा घालण्यासाठी आपापले घर आणि घराच्या परिसरातील सर्व पाणीसाठे रिकामे करणे, कोरडा दिवस पाळणे, पिण्याच्या पाण्याचे साठे झाकून ठेवणे, किटक प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करणे आदी उपाययोजना करणे गरजेचे असते. डेंगी व हिवताप या आजारांचे प्रसार करणारे डास हे घरातील मनिप्लांट, फुलदाणी, कुंडी,फ्रिज, कुलर, जमिनीतील पाण्याची टाकी, प्लास्टिकच्या टाक्या, घराच्या परिसरात पडून असलेले आणि वापरात नसलेले टायर, ट्युब,नारळाच्या करंवटे, प्लास्टिकच्या बॉटल्स, तुटलेले कप व भंगार सामान यांची विल्हेवाट लावण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.
पावसाळ्यात जिल्ह्यातील कोणत्याही गावात किंवा वाडी-वस्तीवर साथीचे रोग उद्भवणार नाहीत, याची दक्षता आरोग्य विभागाच्यावतीने आतापासूनच घेण्यात येत आहे. यासाठी गावा-गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, विहिरी, हातपंप, हॉटेल, टँकरची स्वच्छता नियमितपणे केली जावे. शिवाय पाण्याचे शुद्धीकरण करणे, सांडपाण्याची विल्हेवाट लावणे, धूरफवारणी करणे आदी उपाययोजना ग्रामपंचायतीमार्फत नियमित करण्यात यावे.
हिवताप प्रतिरोध महिन्यात( जुन 2024) करावयाच्या महत्वाच्या बाबी

  • प्रत्येक घरामध्ये शोष खड्डा परसबाग यांची निर्मिती करणे.
  • घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश खेळता राहील अशी व्यवस्था करणे.
  • शौचालयाचे सेप्टीक टैंक हे डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने व्हॅन्ट पाईपला जाळी बसवणे.
  • आठबडयातुन एकदा कोरडा दिवस पाळणे.
  • घरा सभोवतालची गटारे वाहती करणे.
  • बायोगॅस मध्ये जळके तेल अथवा रॉकेल टाकणे.
  • किटकजन्य आजाराबाबत जनजागृती करणे.
  • सार्वजनिक सांडपाणी, गटारी यांची योग्य विल्हेवाट लावणे.
  • डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे.
  • ग्रामपंचायत मार्फत् खड्डे बुजवणे.
  • गप्पी मासे मोठ्या प्रमाणात सोडणे.
  • आवश्यकता भासलेस धुर फवारणी करणे. स्वयंसेवी संस्था, आशा कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच खाजेंगी दवाखाने यर्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेणे-
  • घर, घराच्या परिसरात नारळाच्या कवट्या, टायरमध्ये पाणी साचू देऊ नका.
  • डासांना घरात येण्यास रोखण्यासाठी घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवा.
  • घराच्या परिसरातील अडगळीचे साहित्य नष्ट करा.
  • घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
  • ताप येताच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा त्वरित सल्ला घेऊन औषधोपचार सुरु करा.
  • अंगाबर ताप काढू नका.येता कण कण तापाची,करा तपासणी रक्ताची.
  • स्थलांतरीत,पत्ता सिजन मजुरांनी गावी आल्याबरोबर रक्ताची तपासणी अवश्य करावी.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments