गोंदिया : जिल्ह्यातील काही भागात वन्यप्राणी मानव संघर्ष होत आहेत. यात जिवित हानी पण झालेली आहे. भविष्यात अशा घटना होवू नयेत यासाठी वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला आहे. त्यानुसार नागरिकांनी लहान मुलांना
सायंकाळनंतर घराबाहेर एकटे सोडू नयेत. अंधार पडल्यानंतर शेतात, नदीकाठ, जंगलालगत एकटे जाणे टाळावे. घराच्या सभोवती पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था ठेवावी. घराभोवती असलेले झुडपे, गवत, काटेरी झाडे साफ ठेवावीत, जेणेकरून बिबट्या लपून बसू शकणार नाही. कोंबड्या, शेळ्या, कुत्रे इत्यादी पाळीव प्राणी रात्री बंद व सुरक्षित गोठ्यात ठेवावे. जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी रात्री घराबाहेर जातांना काठी, टॉर्च सोबत ठेवावे. बिबट्या दिसल्यास मोठ्याने आवाज करु नये. तात्काळ वन विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अफवा पसरवू नयेत व सोशल मिडियावर खोटी माहिती शेअर करु नये. वन विभागाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे.
तिरोडा वनपरिक्षेत्रांतर्गत खडकी/डोंगरगाव येथे 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 वाजता एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. हियांश शिवशंकर रहांगडाले, वय 4 वर्षे यावर बिबट्या या वन्यप्राण्याने अचानक प्राणघातक हल्ला केला. त्यामध्ये त्या बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित बिबट्या वन्यप्राण्याला तात्काळ जेरबंद करण्यासाठी घटनास्थळाच्या परिसरात एकूण चार पिंजरे लावण्यात आले. कोणतीही कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन
जुनी किंवा इतर ठिकाणची छायाचित्रे/व्हिडिओ सोशल मीडिया किंवा प्रसारमाध्यमात प्रसारित करू नये. असे केल्यास संबंधितांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्याचप्रमाणे अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनास सहकार्य करावे. जनतेच्या सुरक्षिततेसाठी वनविभाग पूर्ण दक्षतेने कार्यरत आहे, असे उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांनी कळविले आहे.
वन्यप्राणी मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांना सतर्कतेचा इशारा
RELATED ARTICLES






