लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

0
233

भंडारा : गोंदिया जिल्ह्यातील घिवारी येथे लग्न सोहळा आटोपून १८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास परत निघालेल्या वऱ्हाड्याच्या वाहनाला तुमसर–गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शेजारी अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत.
कान्हळगाव येथील सुनील ग्यानीराम कस्तूरे यांचा विवाह लोधीटोला (घिवारी) गोंदिया येथील शामराव लिल्हारे यांच्या मुलीसोबत मंगळवारी रात्री संपन्न झाला. त्या लग्नाला कान्हळगाव येथील वऱ्हाडी गेले होते. लग्न आटोपून वऱ्हाडी गावाला परत येत असताना तुमसर – गोंदिया राज्य मार्गावर असलेल्या नवेगावच्या शेजारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. मात्र, वाहन चालकाने गाडीतून उडी घेतली. त्यानंतर चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला. त्याच गाडीत बसलेला नवरदेवाचा भाऊ सूर्यप्रकाश कस्तूरे याला सौम्य मार लागला होता. तो गाडीतून बाहेर आला आणि त्याने गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले.
त्यात विश्वनाथ बिहारी कस्तूरे, कान्हळगाव (४५) व देवचंद सुखराम दमाहे, खमारी (४२) जबर जखमी झाले होते. तर अमरदीप जयसिंग कस्तूरे ( १४), पंकज अरुण बर्वेकर (२८), पट्टू रामा लिल्हारे (३१) सर्वं कान्हळगाव, माणिक नागपुरे, बेरडीपार (४९) यांचा समावेश आहे. मागून त्याच लग्नाची गाडी आली. त्या गाडीने सर्वांना तुमसर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी खमारी येथील देवचंद सुखराम दमाहे याचा वाटेतच मृत्यू झाला. तर पुढील उपचारासाठी रात्री शासकीय रुग्णालय भंडारा येथे आणत असताना विश्वनाथ बिहारी कस्तूरे कान्हळगाव यांचा मृत्यू झाला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कान्हळगावात आनंद सोहळ्याला गालबोट लागून दुसऱ्या दिवशी शोककळा पसरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here