गोंदिया : “महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, माझे प्रिय नेते आणि मार्गदर्शक अजितदादा पवार यांच्या आज सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातातील अकाली निधनाची बातमी ऐकून मी आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परिवार स्तब्ध झाला आहे. हे दुःख इतके प्रचंड आहे की शब्द अपुरे पडतात. दादांसह विमानातील इतर सहकारी आणि क्रू मेंबर्स यांचाही या भीषण अपघातात जीव गेल्याची खबर मनाला चटका लावणारी आहे.
१९९१ मध्ये बारामती मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आल्यानंतर त्यांनी जलसिंचन, वित्त, नियोजन, ऊर्जा अशा महत्त्वाच्या खात्यांवर दीर्घकाळ जबाबदारी सांभाळताना त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा दिली. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक वेळा (सहा वेळा) उपमुख्यमंत्री पद भूषवणारे ते एकमेव नेते होते. त्यांची कार्यशैली वेगवान, स्पष्ट आणि ठाम होती – नेहमी ‘अॅक्शन मोड’मध्ये राहून प्रशासनाला गती देणे, निर्णय घेणे, जनतेशी थेट संवाद साधणे आणि जनता दरबारात तात्काळ समस्या सोडवणे ही त्यांची ओळख होती.
शेतकरी, सहकारी संस्था, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा आणि सिंचन क्षेत्रात त्यांचे अमूल्य योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. ते ‘दादा’ म्हणून ओळखले जाणारे, कार्यकर्त्यांसाठी नेहमी उपलब्ध राहणारे आणि विकासावर अट्टाहासाने भर देणारे नेते होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून आल्यानंतर मी दादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा सन्मान अनुभवला. त्यांच्या मार्गदर्शनाने, प्रेरणेने आणि पक्षाच्या एकजुटीने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रयत्न केले. दादा आमचे नेते, प्रेरणास्थान आणि कुटुंब होते.
अजितदादांच्या कुटुंबीयांना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, लाखो कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपूरणीय नुकसानीत सामील होत आहे. या दुःखाच्या क्षणी मी आणि माझे कुटुंब त्यांच्यासोबत आहे.अजितदादांना हृदयाच्या गहिराईतून विनम्र श्रद्धांजली! हे नुकसान भरून न येणारे आहे. ओम शांती! अजितदादा अमर राहतील!
राजकुमार बडोले माजी मंत्री (न्याय व विशेष सहाय्य) आमदार, अर्जुनी मोरगाव विधानसभा






