गोंदिया: गोंदिया जिल्ह्यात शनिवार, 26 जुलैच्या सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग काही तास सुरू असलेल्या पावसामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जिल्ह्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात सखल परिसरात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले असून, आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शनिवार, 26 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रे, शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रजीत नायर यांनी सुट्टी जाहीर केली आहे. शिक्षण संस्थांना बंद ठेवण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा ठरला आहे. दरम्यान, धरणांवरही अतिरिक्त दबाव टाळण्यासाठी कालीसरार, पुजारीटोला आणि धापेवाडा प्रकल्पांतून नियंत्रीत स्वरूपात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नदी व नाल्यांच्या किनाऱ्यावर असलेल्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. ग्राम प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतत संपर्कात असून, आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना तयार ठेवण्यात आल्या आहेत. सततच्या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते खचले आहेत, तर पावसामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. शहरातील एकमेव बाई गंगाबाई महिला रुग्णालयात दोन ते तीन फुट पानी साचल्यामुळे रुग्णांना व नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पुर परिस्थिती, शाळांना सुट्टी, अनेक मार्ग बंद
RELATED ARTICLES






