जिल्ह्यात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण – २०२५ला सुरवात
गोंदिया : संपूर्ण देशात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ ला सुरवात झाली आहे. केंद्र शासनाची चमू जिल्ह्यातील विविध गावांत जावून स्वच्छता सुविधांची तपासणी करणार आहे. त्यादृष्टीने सर्व ग्रामस्थांनी मिळून लोकसहभाग व श्रमदानातून या सार्वजनिक सुविधांचा पुरेपूर वापर करत परिसराची स्वच्छता, व प्लास्टिक मुक्तीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी केले आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात निर्माण झालेल्या सुविधांचा वापर तसेच सार्वजनिक ठिकाणी असलेले परिसर स्वच्छता शिवाय प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन बदललेल्या मानसिकतेची माहिती ही समिती घेणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीची तपासणी करून एक हजार गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे जिल्ह्याचे गुणांकन ठरणार आहे त्याचप्रमाणे राज्याचे देखील गुणांकन देशपातळीवरती ठरणार असल्याने प्रत्येक गावाने आपापल्या सुविधांचा वापर नियमित करण्याची गरज मुख्य कार्यकारी अधिकारी मुरूगानंथम एम. यांनी व्यक्त केली आहे.
या पाहणी दरम्यान प्लास्टिक संकलन व व्यवस्थापन म्हणजेच वर्गीकरण केंद्राची पाहणी, खतखड्यांचे व्यवस्थापन, परिसर स्वच्छता तसेच गृहभेटीतून मिळणारी माहिती इत्यादी बाबत गुणांकन होणार आहे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या सुविधांबाबत थेट निरीक्षणासाठी 120 गुण आहेत.
ग्रामस्थांचा प्रतिसादासाठी 100 गुण, गावातील सुविधांचा वापराबाबत 240 गुण तर प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणा दरम्यान 540 गुणांची प्रश्नावली असणार आहे , एकूण 1000 गुणांपैकी प्राप्त होणाऱ्या गुणांच्या आधारे देशातील व महाराष्ट्रातील सर्वात स्वच्छ सुंदर गाव व ग्रामपंचायत या मोहिमेदरम्यान घोषित होणार आहे. ही तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत असल्याने गावातील सुविधांचा वापर तसेच बदललेल्या मानसिकतेबाबत कुटुंबांच्या भेटी शिवाय हा उपक्रम कायमस्वरूपी ठेवण्यासाठी गाव पातळीवर झालेली उपायोजना ग्रामस्थांचा सहभाग इत्यादी बाबी प्रामुख्याने पाहणी होणार आहे. गाव भेटी दरम्यान प्रत्यक्ष निरीक्षण करताना स्वच्छता सुविधांचे निरीक्षण, ग्रामस्थांचा सहभाग जनजागृती, दृश्यमान स्वच्छता इत्यादी बाबत पाहणी होणार आहे. गृहभेट होत असताना घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर हात धुण्याच्या सवयी तसेच कुजणारा व न कुजणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण व त्याकरिता असलेली सुविधा शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम इत्यादी बाबत गुणांकन होईल. तर गाव भेटी दरम्यान रस्त्यावर कुठेही सांडपाणी व घनकचरा पडलेला नाही. शिवाय प्लास्टिक व्यवस्थापन हे कचरा वर्गीकरण केंद्रात केलेले आहे. निर्माण झालेल्या खतखड्यांमधून खत निर्मिती बाबत चे नियोजन केले आहे. शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे काम अतिशय सुरेख झालेले आहे. सार्वजनिक ठिकाणे ही स्वच्छ व नीटनेटकी केलेली आहेत. इत्यादी बाबत ही पाहणी होणार आहे. सार्वजनिक ठिकाणांत विशेषत: धार्मिक स्थळे, शाळा अंगणवाडी परिसर, बाजार तळ या ठिकाणी उघड्यावरती कचरा पडलेला नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाची सुविधा नीटनेटकी आहे. वापर सुरू आहे. कचरा वर्गीकरणासाठी वर्गीकरण केंद्र आहे. आणि हा परिसर स्वच्छ असून मैलागाळ व्यवस्थापनाबाबत गावात सुविधा आहे. अशा प्रकारची पाहणी व गुणांकन होणार आहे. प्लास्टिक संकलन व प्रक्रिया केंद्र तसेच गोबरधन व मैलागाळ व्यवस्थापन इत्यादीचे पाहणी दरम्यान गुणांकन होणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची सुविधा ही आगामी भविष्यकाळात बचत गटांना किंवा इतर व्यवस्थेमार्फत कायमस्वरूपी चालविण्याबाबत सुरू ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीने शाश्वत उपायोजना केलेली असल्यास त्याचेही गुणांकन यात होणार असल्याने सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच ग्रामपंचायत अधिकारी तसेच ग्राम पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी केले आहे.
——-
गोंदिया जिल्ह्यातील ५४८ ग्रामपंचायत अंतर्गत ८६८ गावे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ मध्ये सहभागी होत आहेत. या गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या सुविधांची समिती पाहणी करून गुणदान करणार आहे. उपक्रमाची माहीती सर्व गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना पोचविण्यात आली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतिरकर यांनी कळविले आहे.
परिसर स्वच्छता व प्लास्टीक मुक्ती वर भर द्या! : मुकाअ मुरुगानंथम एम. यांचे आवाहन
RELATED ARTICLES