Friday, April 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द : मंत्री मंगलप्रभात लोढा

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द : मंत्री मंगलप्रभात लोढा

स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गोंदिया : जिल्ह्यातील विविध घटकातील गरजू लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेश हर्षे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रारंभी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. त्यानंतर मैदानावरील परेडचे निरीक्षण केले. पोलीस बँड पथकाने महाराष्ट्र गीत सादर केले. भारत राखीव बटालीयन पथक, पुरुष पोलीस दल, महिला पोलीस दल, होमगार्ड पुरुष पथक, होमगार्ड महिला पथक, फुलचूर हायस्कुल भारत स्काऊट पथक, पोलीस बँड पथक, श्वान पथक, रुग्णवाहिका पथक व अग्नीशमन दल यांनी परेडचे संचलन केले.

मंत्री श्री. लोढा पुढे म्हणाले, गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. शासकीय आधारभुत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये 189 धान खरेदी केंद्रामार्फत 78 हजार 349 शेतकऱ्यांकडून 24 लाख 67 हजार 531 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्याची आधारभुत किंमत 567 कोटी 53 लाख 22 हजार रुपये असून 567 कोटी 41 लाख 90 हजार रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. तसेच खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये शासनाकडून नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी (बोनस) मंजूर करण्यात आलेली असून 90 हजार 328 शेतकऱ्यांना 180 कोटी 61 लाख 53 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी अदा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रती वर्ष 6 हजार रुपये तीन टप्प्यांमध्ये प्राप्त होत असून या योजनेचा 20 वा हप्ता मा. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते 2 ऑगस्ट 2025 रोजी जिल्ह्यातील 2 लाख 20 हजार 989 पात्र शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आला.

जास्तीत जास्त मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 357 कोटी 20 लाख 76 हजार निधी खर्च झालेला असून त्यामधून 1 कोटी 33 हजार मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झालेली आहे. याद्वारे 1 लाख 97 हजार 593 कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात 1 ते 7 ऑगस्ट 2025 पर्यंत ‘महसूल सप्ताह’ साजरा करण्यात आला असून या काळात नागरिकांना विविध दाखले, प्रमाणपत्र यासोबतच शासनाच्या योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळवून देण्यात आला.

यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामुहिकरित्या अवयव दान प्रतिज्ञा घेण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments